Wednesday, June 26, 2024

प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे जनक लोकमान्य टिळक


भारतीय इतिहासातील ' न भूतो न भविष्यति ' अशी राजकीय विरासत कुणाची असेल तर लोकमान्य टिळक हे नांव प्रकर्षाने पुढे येतं.त्यांच्या स्मृती शताब्दीचं हे वर्ष आहे.पक्षीय अथवा सत्तेचं राजकारण न करता  केवळ आणि केवळ राष्ट्रहितासाठीच राजकारण लोकमान्यांनी केले.ब्रिटीश इतिहासकारांनी त्यांची नोंद भारतीय असंतोषाचे जनक म्हणून खोडसाळपणाने केली असली तरी आमच्यादृष्टीने ते प्रखर राष्ट्रवादाचे जनक होते.ते कसे?हे आपण थोडक्यात समजून घेतले पाहिजे.
 ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या सिंहगर्जनेतून  ब्रिटिश गुलामगिरीचा कडवट विरोध केला होता. हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची रोवलेली मुहूर्तमेढ असो किंवा आपल्या परखड लेखणीने स्वातंत्र्य चळवळीत वेळोवेळी फुंकलेले प्रयाण असोत राष्ट्रवादावर त्यांनी ब्रिटीशांनी कधीच तडजोड केली नाही.
 वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे चाफेकर बंधूंनी केलेले खून , मुझफ्फरनगरमध्ये खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्याकडून झालेला  केनेडी मायलेकींचा झालेला खून,   टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना नाशिकमध्ये झालेला जॅक्सनचा खून, त्या सर्वांमागे टिळक या तीन अक्षरांचे व्यक्तिमत्त्व होते, असे या चिरोलने बिनदिक्कतपणे ‘टाइम्स’मध्ये छापलेले होते. त्याच ‘टाइम्स’नेही ’पुणेकर चित्पावनांचे प्रमुख’ असा उल्लेख करत त्यांच्याविरोधात अग्रलेख लिहिले. टिळकांमागे कायमचा ससेमिरा लावण्याचा हा उद्योग होता. पण टिळकांनी कधीच माघार घेतली नाही.
ब्रिटिशांनी १९१८ मध्ये न्यायमूर्ती एस.ए. टी. रौलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ’सीडिशन कमिटी’ने सादर केलेल्या अहवालाच्या पहिल्याच प्रकरणात आणि त्याच्या प्रस्तावनेत, ’’१८८३ मध्ये टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देत गणपती या देवाला रस्त्यावर आणले आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करायला प्रारंभ करून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजात क्रोध जागृत केला,’’ असे म्हटले आहे. त्यावेळी टिळकांनी लिहिलेले गणेशोत्सवाचे अग्रलेख वाचले तरी त्यांच्या त्या उत्सवामागे असलेल्या तीव्र भावनांचे अधिक प्रकटीकरण होते. 
टिळक जेव्हा अजून ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले जात नव्हते, तेव्हाही त्यांनी जनतेचेच प्रश्न हाती घेतलेले होते. त्यांनी ९ ऑगस्ट १८९२ च्या ’’इंग्रजी राज्यांत आम्हांस फायदा काय झाला?’’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्या अग्रलेखातून इंग्रजी राज्याचे फायदेच अधिक सांगितलेले आहेत, असाच कोणाचाही समज होईल, पण शांतता, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, शेतकी सुधारणा आदींचा त्यात त्यांनी उल्लेख केला असला तरी त्यातच एक मेख आहे. इंग्रजी राज्यकर्त्यांनी आमच्या सल्ल्याने राज्य कारभार चालवावा, अशी जनतेची अपेक्षा असेल तर त्यात गैर काहीही नाही, असेही लिहिलेले आहे. त्यावेळी सुशिक्षितांचा एक वर्ग आणि अल्पशिक्षितांचाही एक वर्ग असा होता की, त्यांना इंग्रजी सत्तेने केलेल्या सुधारणांनी भारावून टाकले होते. आगगाडी आली, टपालाची चांगली सोय झाली, रस्ते झाले, तारयंत्रणा कार्यान्वित झाली आणि हे सर्व इंग्रजी राज्यकारभाराने केले, ही त्यांची समजूत होती. टिळकांनी त्या फुगलेल्या फुग्याला हळूच टाचणी लावली. इंग्रजांनी या सर्व सुधारणा का केल्या तर त्यांना भारतात व्यापारउदीम करण्यास चांगल्या सोयी हव्या होत्या आणि आपल्या देशातल्या मालाला सर्वदूर नेऊन त्याच्या विक्रीतून झालेला नफा त्यांना इंग्लंडमध्ये घेऊन जायचा होता म्हणून त्यांनी या सुधारणा आपल्याला देऊ केल्या, त्यात त्यांचाच जास्त फायदा झाला, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी २४ जानेवारी १८९३ रोजी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक होते, ’’आमच्यावर जुलूम कसा होतो?’’ त्या अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे की, ’’लोकांवर जुलूम होण्यास केवळ शेतकी हेच एकमेव खाते आहे, असे नाही. जंगल, मीठ, अबकारी, कालवे, देवी, रजिस्ट्रेशन, शाळा, पोलीस आणि गावसफाई यांनी रयतेस भंडावून सोडले आहे. तोळाभर मीठ अगर खारी माती काढीन म्हटले तर सरकारचा शिपाई उभा आहेच! शेताबाहेर जरा गुरे गेली की, जंगलच्या अधिकार्‍याकडे खेपा घालून दंड भरून त्यांची सुटका करून घ्यावी लागते. दारूची दुकाने त्यांच्या घरात व बाजारात बसविली जातात. इंग्रज सरकारच्या सर्व सत्तेचा मूर्तिमंत अवतार जो पोलीसचा शिपाई तो यमदूतासारखा त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत असतो. अशा स्थितीत कोणत्याही राजाच्या रयतेस कधीतरी सुख होईल की काय याचा लोकांनीच अजमास करावा, अशी सर वेडरबर्न यांची विलायतच्या लोकांस सूचना आहे. पूर्वीच्या राज्यांतून हे सर्व अधिकार रयतेकडे असत. जंगलांची, ताडामाडाची, गायरानांची, पोलिसांची, मिठाची व आरोग्यरक्षणाची सर्व व्यवस्था जेथल्या तेथे आपआपल्या सवडीप्रमाणे व गरजेप्रमाणे जे ते तेथे लक्ष ठेवित असत; पण आता ती सर्व व्यवस्था जेथल्या तेथे आपआपल्या इंग्रज सरकारने बदलून टाकून मीठ देण्याचा, झाडे राखण्याचा व दारू पाजण्याचा आपणाकडे मक्ता घेतला आहे ! आणि हा मक्ता चालवतेवेळी सरकार आपल्या तिजोरीकडे काय ते लक्ष पुरवते.’’
 टिळकांनी राष्ट्रवादी भूमिकेतून घेतलेली अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 
 टिळकांचा राष्ट्रवाद हा अस्सल देशी होता. त्यात कोणताही अहंभाव नव्हता. आपल्या देशाचे दुर्दैव असे की, त्याकडे पाहणारे आजच्या घटकेलाही वेगळ्या चष्म्यातून पाहात असतात. त्यांना लावले जाणारे निकष हेही आजच्या पातळीवरचे असतात. ब्रिटिशांच्या विरोधात लढा देत असताना त्यांनाही अशा अनेक अडथळ्यांना ओलांडून जावे लागले होते. महाराष्ट्रातल्या काही जातीवंत नेत्यांनी तर ‘‘आम्हाला स्वराज्यच नको, कारण ते टिळकांना पाहिजे आहे,’’ अशा तर्‍हेचा अत्यंत मूर्खपणाचा वाद घातला होता. विठ्ठल रामजी शिंदे यांनी असा स्वराज्याला आडवे जाणार्‍यांचे बुरखे टरकावले होते. १९१४ नंतर टिळकांमध्ये झालेला बदल क्रांतिकारक होता. ’’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’’ अशी घोषणा करताना त्यांनी लखनौत जे सांगितले ते महत्त्वाचे आहे.
 लखनौ कॉंग्रेसच्या त्या अधिवेशनात टिळक म्हणाले होते की, ’’आम्हाला ब्रिटिश सांगतात, तुम्ही आर्यांचे वंशज आहात, तुम्ही या भूमीचे खरे मालक नाही.’’ आम्ही आर्यांनी इथल्या मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला. त्यानंतर मुस्लिमांनी या देशावर आक्रमण करून तो आमच्याकडून काबीज केला. मुस्लिमांकडून, मराठ्यांकडून इंग्रजांनी तो घेतला. अर्थातच इंग्लिश राज्यकर्ते हे अनार्यांच्या या भूमीचे पालक होतात. ठीक आहे, मी त्यांचा हा युक्तीवाद मान्य करायला तयार आहे, पण मग ते या भूमीचे सध्याचे रक्षणकर्ते आहेत, तर त्यांनी ही भूमी सोडून भिल्ल, गोंड आणि आदि द्रविडआदी कोणाही आदिवासी, दलित यांच्या ताब्यात परत द्यावी आणि मुख्य म्हणजे येथून तातडीने चालते व्हावे. या भूमीचे जे मूळ मालक आहेत, मग भले ते कोणत्याही जातीधर्माचे असोत, पंथाचे असोत; त्यांची सेवा करायला आम्ही आनंदाने तयार आहोत. ब्रिटिशांना ’चले जाव’ असे बजावणारे ते पहिले नेते होत. लखनौमध्ये लोकमान्यांकडून ही घोषणा केली जाताच सभागृहात प्रचंड जल्लोष झाला, टाळ्या तर एकसारख्या वाजतच राहिल्या. लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या वर्मावरच नेमका घाव घातला होता. त्याचा आनंद गगनाशी स्पर्धा करत होता. टाळ्यांचा कडकडाट कमी व्हायची थोडीशी वाट पाहून त्याच टीपेला गेलेल्या आवाजात लोकमान्य म्हणाले, ’’होमरूल (इज माय बर्थराइट ऍण्ड आय शॅल हॅव इट’’ सर्व सभागृह प्रचंड आवाजाने दुमदुमून गेले, एक क्षण तर असा निर्माण झाला की, मांडव कोसळतो की काय असेच अनेकांना तेव्हा वाटले होते. लोकमान्यांनी स्वराज्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या. परकियांकडून तसेच स्वरकियांकडून टीकाही सहन केली. ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधात सर्वतोपरी आक्रमक भूमिका घेतल्या. तथापि लोकमान्य डगमगले नाहीत. टिळकांनी गोहत्त्येच्या विरोधात भूमिका घेतली आणि हा मुद्दा जिथे रेटायचा तिथे रेटला. मुस्लीम लीगच्या लाहोर प्रांतिक अधिवेशनाला ते हजर राहिले होते. त्या सभेत बोलताना त्यांनी, ’’हिंदूंच्या घरातून ओढून काढल्या जाणार्‍या गायींबद्दल आणि भररस्त्यात त्यांना मारले जाण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यावेळी त्या सभेत हजर राहिलेले मोहम्मद अली जिना यांनी लगेचच मुस्लीम समाजाला हिंदू सणांच्या दिवशी तरी गोहत्त्या टाळा, असा सल्ला दिला आणि लगेचच तसा ठराव संमत करवून घेतला.  इंग्लंडमध्ये १९१८ मध्ये स्वराज्याचा प्रचार करायला गेलेल्या टिळकांना जेव्हा, ’’समजा, आजच तुम्हाला स्वराज्य दिले गेले तर तुम्ही कोण होणार? परराष्ट्रमंत्री की पंतप्रधान?’’ असा सवाल करण्यात आला तेव्हा टिळकांनी त्या प्रश्नकर्त्याला नम्रपणे सांगितले की, ’’स्वराज्य आज मिळाले, तर मी फर्ग्युसनमध्ये जाईन आणि परत गणित विषय शिकवायला घेईन.’’असे नि:स्वार्थ व प्रखर राष्ट्रवादी राजकारण टिळकांनी आयुष्यभर केले.त्यांना हा मानाचा मुजर
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार

No comments:

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...