Tuesday, December 27, 2022

पत्र लिही पण.........

 

पत्र लिही पण.........
परवाच पोस्टमनने आडनांवाचा पुकारा केला.तेंव्हा नेहमीप्रमाणेच एखादा लिफाफा अथवा रजिस्टर असावे म्हणून बाहेर डोकावून पाहिले आणि त्याने चक्क एक पोस्टकार्ड हातात दिलं.ते पाहून मी क्षणभर अचंबित झालो.कारण आजकाल पोस्टकार्ड येणं तसं दुर्मिळच नाही का ?
  ते पत्र म्हणजेच पोस्टकार्ड आमच्या चिरंजीवानेच लिहीलेले होतं.तो योगायोगाने इथंच आलेला होता म्हणून त्याला आश्चर्यकारक चेहऱ्यानेच विचारलं पोस्टकार्ड लिहिलंस?कसं काय? तो म्हणाला कांही नाही सहजच आठवण आली म्हणून.मला खूप खूप आनंद झाला.
तंत्रज्ञानाच्या या युगात तसे आपण सर्वच टेक्नोसॅवी झालेलो आहोत प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आपण आपल्या मुलाबाळांचे घेत असतो .अशा काळात पोस्टकार्डचा उपयोग तसा मर्यादितच राहणार नाही का? अशा काळात मुलाने सहज आठवण आली म्हणून लिहीलेलं हे पत्र खूप सुखावून गेलं.
भारतात १८७९ मध्ये म्हणजे १४३ वर्षांपूर्वी केवळ ३ पैशात सुरू झालेली ही टपाल सेवा अद्यापही  आपलं स्थान टिकवून आहे.आता फक्त १ रूपया त्याची किंमत आहे.पण आजही लाखो लोक या सेवेचा लाभ घेतात हे महत्त्वाचे आहे.
अगणित संस्था,संघटना कार्यालयं, कुटुंब यांच्या व्यक्तिगत संपर्काचं माध्यम म्हणजे हे पोस्टकार्ड . दिवाळी किंवा अन्य सणांच्या शुभेच्छा असो किंवा एखादी शुभ अथवा दु:खद वार्ता ती संक्षिप्त मजकूरात कळवण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड.आपल्या घरापासून दूर असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळवण्याचं किंवा विचारण्याचं माध्यम म्हणजे पोस्टकार्ड. मला आठवतंय , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक यांचा संपर्क देशभरात लाखो सर्वसामान्य स्वयंसेवकांशी केवळ पोस्टकार्डवर लिहीलेल्या पत्राद्वारे होत होता. आजतागायत अगणित प्रचारक ही प्रथा पाळत आहेत. अभाविपचं काम करत असतानाची ही गोष्ट आहे.अमळनेरात जळगांव जिल्ह्याच्या एका वर्गाच्या व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती जिल्हा प्रमुखांशी रोज संपर्क ठेवणं आवश्यक होतं तेव्हा टेलिफोनदेखील फारसे नव्हते.मी रोज एक पत्र लिहून १५ दिवस संपर्क ठेवला तितक्याच तत्परतेने मलाही तिकडून उत्तरं मिळाली.अर्थात त्यावेळी टपाल खातेही खूप तत्पर होते हा भाग वेगळा.एकूण काय तर पोस्टकार्डमुळे किती तरी लोकांशी सहज संवाद होत असे.
मित्रहो, मनातल्या भावना जितक्या उत्कटतेने आपण पत्रातून व्यक्त करू शकतो ना तितकं फोनवरचा संवाद, मेसेजेस म्हणून आपण नाही व्यक्त करू शकत.अशावेळी काय हरकत आहे पोस्टकार्डचा वापर करायला?
कवयित्री इंदिरा संत यांची एक कविता आहे पत्र लिही पण.......त्याचा संदर्भ वेगळा आहे.पण त्यातले हे पहिले तीन शब्द महत्वाचे आहेत.पत्र लिही पण ..... पोस्टकार्डवर....
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
9527153925

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...