Showing posts with label लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार. Show all posts
Showing posts with label लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार. Show all posts

Wednesday, July 29, 2020

लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार


आयुष्यभर सार्वजनिक जीवनात वावरत असूनही लोकमान्य टिळक  मूलभूत अध्यात्मिक अध्ययन व  चिंतनापासून कधीच दूर गेले नाहीत.याउलट अध्यात्म आणि राजकारण,अध्यात्म आणि राष्ट्रवाद याची सांगड घालून अनेक तरूणांना त्यांनी त्याकाळात निस्पृह देशभक्तीसाठी प्रवृत्त केले.निष्काम कर्मयोग हा त्यांच्या समग्र विचारांचा गाभा होता.त्यांचा प्रत्येक व्यवहार याच दिशेने जाणारा होता.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून त्यांचा अध्यात्मिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते.
       महर्षी योगी अरविंदांनी एका ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की, ‘टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की, कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते गाठायचे. त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. लोकमान्यांचे सारे जीवन ब्रिटिशांशी झगडण्यात गेले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे त्यांनीही त्यांचे सर्वस्व राष्ट्रासाठी दिले. हे करतांना त्यांनी स्वत:च्या घरादाराची व कुटुंबिय यांचीही चिंता केली नाही.
१९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्‍वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.ग. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्‍या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !”
     टिळक विचार हे स्वप्नदर्शक नसून, त्याला तात्त्विक अधिष्ठान, आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे. लोकमान्य टिळकांचे ओरायन, आक्र्टिक होम इन वेदाज्, ब्रrासूत्र, वेदांग ज्योतिष आणि गीतारहस्य या स्वतंत्र संशोधनात्मक लेखनाचा केवळ भारतीय नव्हे, तर पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गौरव केला. टिळकांच्या पहिल्या दोन ग्रंथांमुळे भारतीय जनतेत स्वत्व जागृत झाले.
टिळक युगाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतल्याखेरीज टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणो अवघड आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांची धाव सुखोपभोगाकडे आहे. त्याप्रमाणे या पूर्वेकडील लोकांची नाही. `आयुष्य सुखात घालवण्याच्या साधनांपेक्षा आयुष्याचे परिणामी साफल्य कसे होईल’, हा विचार डोळयांसमोर ठेवून कर्मयोगाच्या बैठकीवर त्यांनी राष्ट्ररचना केली आणि राष्ट्राचे रूप निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न केला.
  लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागल्यावर त्यांना गुप्‍तपणे मंडाले येथील तुरुंगात नेण्यात आले. तेथील जीवन म्हणजे सहा वर्षांचा दारूण एकांतवास. तेथे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी त्याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. त्यांना तेथे सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून रहावे लागे. अशा स्थितीत बौद्धिक काम करणे अशक्य होते. तरीही त्यांनी बौद्धिक परिश्रम घेऊन `गीतारहस्य’ हा जगाला थक्क करून सोडणारा ग्रंथरूपी चमत्कार केला.
   शसुखवादाचा सिद्धांत हा अधिभौतिक (Positive) सिद्धांत असून गीतेचा नीतिसिद्धांत आध्यात्मिक आहे व अधिभौतिक सिद्धांतापेक्षा ज्येष्ठ आहे. जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांट आणि ब्रिटिश नीतिवेत्ता टी. एच. ग्रीन हे आध्यात्मिक नीतिशास्त्राचा पुरस्कार करतात व गीतेचा सिद्धांत त्यांच्या विचारांच्या जवळ येणारा आहे, असे टिळक सांगतात. 
मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे.
जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हाच त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधार होता.मोक्षाप्रत जाणारा अध्यात्ममार्ग हा केवळ तत्त्वचिंतन अथवा तपश्चर्येतून जात नाही तर निष्काम कर्मयोगातूनही मोक्षाप्रत जाता येते हे त्यांनी आपल्या विचारातून आणि व्यवहारातून सिध्द केले.अशा महान कर्मयोगी टिळकांच्या चरणी हे विचार पुष्प सादर समर्पण!!!!!!
                                           शशिकांत घासकडबी, नंदुरबार.


समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...