Showing posts with label झुंजार पत्रकार लोकमान्य टिळक. Show all posts
Showing posts with label झुंजार पत्रकार लोकमान्य टिळक. Show all posts

Saturday, July 25, 2020

झुंजार पत्रकार' लोकमान्य टिळक

'
     लोकमान्य टिळक हे मुळातच तल्लख बुध्दीमत्ता असलेले स्वतंत्र व परखड विचारांचे होते.त्याकाळात तथाकथित बुद्धिवादी इंग्रजांचे गुणगान करण्यातच आपली लेखणी झिजवत होते.लोकमान्यांना हे सहन झालं नाही.असे परधार्जिणे लेखक व पत्रकार हे समाजाचे प्रबोधन करण्याऐवजी भारतातील सर्वसामान्य माणसाला वैचारिक गुलामगिरीत ढकलण्याचाच प्रयत्न करीत आहेत,असे त्यांना वाटले.स्वातंत्र्य लढ्याच्या काळात प्रखर राष्ट्रवाद तसेच इंग्रजी राजवटीच्या जुलमी कारभारावर आसूड ओढणारी पत्रकारिता त्यांना अभिप्रेत होती. त्यामुळेच केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'केसरी' दैनिकाचं मोठं योगदान आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी पार मोठी आहे
भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं आणि लढणारं एक धोरणी आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक किती चुकले किती बरोबर आहेत याच्या कितीही चर्चा झाल्या तरीही टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले योगदान कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. किंबहुना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ' प्रखर राष्ट्रवादाचे जनक' म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. विविध अग्रलेख लिहून  ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी  खूप मोठी आहे.
भारतात पत्रकारिता ही पाश्चिमात्य जगाच्या  तुलनेत फारच उशिरा आली. त्याहीपेक्षा पत्रकारितेचे महत्त्व समजायला लोकांना फार वेळ लागला. पण देशाला इंग्रजांच्या विरूद्ध जागं करायचं असेल, स्वातंत्र्याची लढाई जर समर्थपणे लढायची असेल तर पत्रकारितेसारखं दुसरं हत्यार नाही हे टिळकांनी चांगलंच हेरलं होतं. अमेरिकन क्रांतीही पूर्णपणे माध्यमांनी पुढे नेली होती. यासाठीच केसरी आणि मराठासारखे वर्तमानपत्र टिळकांनी सुरू केले. 
टिळक लिहित असलेले अग्रलेख तेव्हा सारा समाज वाचत होता. त्यांच्या वैचारिक प्रबोधनातून सारा समाज ढवळून निघत होता. पुण्यात 1897 सालं उगवलंच ते प्लेगची साथ घेऊन. या भयानक साथीच्या रोगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही जीव घेतला. तेव्हा सरकारने रॅन्ड नावाचा अधिकारी पुण्यात नियुक्त केला होता. प्लेगच्या रूग्णांना अत्यंत अमानुष वागणूक इंग्रज देत होते. प्लेगच्या साथीच्या नावाखाली इंग्रज नागरिकांचा प्रचंड छळत करत होते. या साऱ्या जाचाविरूद्ध टिळक लिहित होते. ब्रिटिशांच्या अन्यायावर टीकेचे आसूड टिळकांनी ओढले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुण्यातल्या दोन तरूणांनी रॅण्डचा खून केला. पण रॅण्डला मारण्यास त्यांना प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसून टिळक आणि त्यांचे लेखच आहेत हे ब्रिटीशांना कळायला वेळ लागली नाही आणि भारताच्या इतिहासातला पहिला राजद्रोहाचा म्हणजेच 'सेडिशन'चा खटला टिळकांवर टाकला गेला. या खटल्यात टिळकांना 18 महिने तुरूंगवास ठोठावण्यात आला. तुरूंगातून सुटल्यावरही टिळकांनी सरकारवर टीकास्त्र सोडणे चालूच ठेवले.
त्यांचे हितचिंतक तुम्हाला असं लिहिल्याने कैद होऊ शकते तेव्हा असं लिहू नका असं वारंवार सुचवायचे. पण वर्तमानपत्र ही सरकारला खूश करण्यासाठी नाही तर सरकार सामान्यांवर जो अन्याय करतंय,ज्या धोरणांनी सरकार या देशचं नुकसान करतंय ती धोरणं तो अन्याय लोकांसमोर आणणे याचसाठी आहेत ही टिळकांची धारणा होती. आज जगाला हादरवून सोडणाऱ्या पनामा पेपर्ससारख्या प्रकरणावर आणि त्यातल्या आरोपींवर जेव्हा  भारतीय माध्यमं मुक गिळून गप्प बसतात तेव्हा खरोखरच निर्भीडपणे जिवाची पर्वा न करता पत्रकारिता करणाऱ्या टिळकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
1906 साली टिळकांवर पुन्हा एकदा राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. यावेळी टिळकांनी  भारतीयांच्या सहिष्णुतेलाही मर्यादा असतात असं बजावलं होतं आणि सरकारवर ' विनाशकाले विपरीत बुद्धी ' नावाच्या लेखातून सडकून टीका केली होती. यावेळी पुन्हा एकदा टिळकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आणि टिळकांचे वकील मात्र मोहम्मद अली जिन्ना होते. यावेळी टिळकांना सहा वर्षांचा तुरूंगवास सुनावण्यात आला. टिळकांवर आयुष्यात तीनदा राजद्रोहाचा खटला भरला आणि तिन्हीदा त्यांना शिक्षा झाली तरीही टिळकांनी सरकारविरूद्ध  लिहिणे चालूच ठेवले.
फक्त राजकीयच नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांवरही टिळक लिखाण करत असत पण ते सारं लिखाण ते  स्वातंत्र्याशी जोडतं. गीतेचा सार सांगताना त्यांनी कर्मयोग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत राहा, या हेतूनेच सुचवला होता. लढत राहा स्वातंत्र्याची अपेक्षा करू नका, कारण लढलो तर ते नक्की मिळेल अशी टिळकांची धारणा होती.
टिळकांच्या काळात भारतातले इंग्रजी वर्तमानपत्र सरकारची तळी उचलण्यातच धन्यता मानत होते. प्रादेशिक भाषांमध्ये इतकं प्रभावीपणे पत्रकारिता रूजवणाऱ्या टिळकांवर या इंग्रजी वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली. सत्य उघडकीस आणल्याबद्दल एका पत्रकारावरच माध्यमांनी टीका करण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. पण टिळकांनी कोणालाच भीक घातली नाही. आयुष्यभर आपल्या पत्रकारितेतून स्वराज्यासाठी लढत राहिले. पुढे गांधीजींनीही टिळकांचा आदर्श घेत पत्रकार होऊन समाजाचे प्रबोधन आणि ब्रिटिशांवर टीका करणं चालूच ठेवलं आणि स्वतंत्र होईपर्यंत टिळकांची परंपरा पुढे नेली.
  गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या आपल्या बांधवाना सोडवण्यासाठीही लोकमान्य टिळक झटत राहिले. आजच्या प्रसारमाध्यमांकडे बघितल्यानंतर त्यांनी टिळकांकडून कांहीं धडा घ्यायची नितांत गरज आहे असे म्हणावे लागेल.
   भारतीय पत्रकारितेला वेगळा आयाम देणाऱ्या लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आजच्या परिस्थितीतही किती चपखलपणे लागू होतात,सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, पुन:श्च हरि ओम, अगंतुक अधिकाराची थोरवी अशा महत्त्वाच्या अग्रलेखांमुळे माध्यमांच्या विस्फोटाच्या काळात लोकमान्यांची पत्रकारिता समजून घेता येणार आहे.गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे मनोरंजन करणे हे वर्तमानपत्राचे खरे कर्तव्य नव्हे. खरे पत्रकार हे वाचकांचे राजकीय मार्गदर्शक म्हणूनच काम करीत असतात, असा विचार लोकमान्यांनी दिला आहे.'आजच्या पत्रकारिता क्षेत्राने हे समजून घेण्याची गरज आहे.नि:स्पृह व झुंजार पत्रकार असलेल्या लोकमान्य टिळकांना ही मानवंदना!!!!
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...