Friday, August 7, 2020

आत्मारामांची अमृतवाणी

 नुकताच ५ ऑगस्टला श्रीरामजन्मभूमीवर संकल्पित भव्य मंदिर उभारणीचं भूमिपूजन विधीवत व आनंदमयी वातावरणात करण्यात आलं आणि संपूर्ण भारतवासियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.' याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड झाला ' असा कृतार्थतेचा भाव आपल्या सर्वांच्याच मनात व चेहऱ्यावर दाटून आलेला होता.या आनंदाच्या सुवर्णक्षणांवर आपल्या अमोघ वाणीतून अक्षरशअमृताची बरसासोहळ्यातीोन महनीय व्यक्तींच्या मुखातून झालयाचे सर्वाधिक अप्रूप वाटले.अनेकांनी समाज माध्यमातून खूसकारात्मक चर्चा केली हे.या सर्व चर्चांबाबत माझ्या मनाआलेला भाव मी सर्वत्र व्यक्त केला व तो अनेकांना आवडला.तो भाव असा होता,'' काल मोदीजी बोलतच नव्हते त्यांच्यातला आत्माराम बोलत होता.ज्यांनी दासबोध वाचला असेल त्यांना 'आत्माराम '   संकल्पना लक्षात येईल. जी कठोर साधनेतून प्राप्त होते."  

        'आत्माराम'हा वेदांतपर ग्रंथ आहे; समर्थांच्या मते भगवंताची भक्ती केली म्हणजे वेदांतातील तत्त्वज्ञान जीवनात उतरते. माणसाला परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मात्र त्यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात राहून वारंवार श्रवण करावे लागते आणि संतांनी सांगितले त्यानुसार आपल्या जीवनाला आकार द्यावा लागतो. याचा अर्थ, समर्थांच्या मते भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नुसते श्रवण पुरेसे नाही. ज्याच्याकडून ज्ञान हवे आहे, त्याची सेवा घडायला हवी आणि त्याच्याशी मनाने एकरूप व्हायला हवे. 
सरसंघचालक मा.मोहनरावजी भागवत आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी या दोघांच्याही जीवनाकडपाहिल्यानंतर ही अनुभूती आपल्याला येते.
  प्रभु श्रीरामस्वरूप देशाला देव मानून ही भगवंताची भक्ति या दोघांनीही मनापासून केली म्हणून त्यांच्या जीवनात वेदांताचं तत्वज्ञान उतरलं.परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी परम पूजनीय श्रीगुरूजी आणि अगणित सत्पुरूषांचा सहवास त्यांना लाभला.अनेक साधूसंतांच्या सान्निध्यात देखील ते राहिले.मोदीजी काही काळ अध्यात्ममार्गात देखील होते.आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसारच ते राजकारणात सेवाभाव मनात ठेवून ते आले.आपापल्या सान्निध्यातील सत्पुरूषांनी दिलेल्या मार्गानुसारच त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला.समर्थांच्या उक्तीनुसार या भक्तीतूनच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे.संघकार्य असो किंवा अध्यात्ममार्ग तिथे केवळ श्रवणभक्ती असून चालत नाही तर ज्याच्यापासून ज्ञान घेतलं तर याची सेवा घडावी लागते त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.ही जिवीत कार्यातील एकरूपता दोन्हीही व्यक्तिमत्वात आपल्याला पहायला मिळते.आत्माराम दासबोधात समर्थांनी यालाच स्व स्वरूप म्हंटलं आहे.
आत्माराम मधील केवळ दोन ओव्या या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात.
   त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥ म्हणजे सर्वस्वाचे समर्पण करून माझ्या बोलण्याप्रमाणे आचरण केलं तर तूला मी सत्यस्वरूपापर्यंत नेईन.हे समर्थांनी आपल्या शिष्यांना दिलेलं वचन आहे.ठीक याच प्रकारचा व्यवहार या दोन्हमान्यवरांचा असल्यानेत्यांच्या मुखातून हे अमृताचे ोल प्रगटले.
दुसऱ्या एका ओवीत समर्थ म्हणतात,
बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते॥अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥
शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे ,परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात आपल्या अनुभवाला येऊ लागतो आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच सत्यस्वरूप असतं.या सत्यस्वरूपाचं दर्शन या दोन्ही भाषणातून आपल्या अनुभवाला आलं म्हणून ही 'आत्मारामांची अमृतवाणी 'असल्याचे आपण अनुभवले.
पूजनीय सरसंघचालक यांनी या प्रसंगी केलेलं भाषण यादृष्टीने महत्त्वाचं आहे.ते म्हणतात की,
" आज संपूर्ण देशात एक आनंदाची लाट आली आहे.। शतकानुशतकाची इच्छा आज पूर्ण होतेय.परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठा आनंद भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ज्या आत्मविश्र्वासाची आवश्यकता होती आणि जेआत्मभान  आवश्यक होतं ते सगुण-साकार रूपात प्रस्थापित होण्याचा हा शुभारंभ आज आहे. हे अधिष्ठान है आध्यामिक दृष्टिचं आहे.
' सिया राममय सब जग जानी 'सर्व  जगाला आपल्यात पाहण्याची आणि  आपल्यात संपूर्ण जग पाहण्याची ही भारतीय दृष्टि आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक व्यक्तिचा व्यवहार आजसुद्धा जगात सर्वाधिक सौजन्याचा व्यवहार असतो.आणि आमच्या  देशाचा  सामूहिक व्यवहार सर्वांसोबत ' वसुधैव कुटुम्बकम ' चा असतो. परमवैभव संपन्न  आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा  भारत त्याच्या निर्माणाचा हा  शुभारंभ आहे.
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः'
जीवन जगायचं कसं? याची दृष्टी आमच्याजवळ आहे. कोरोनाच्या स्थितीत  संपूर्ण  जग अंर्तमुख झालंय.त्यांना चिंता आहे  कुठे चुकलं याची.यातून मार्ग  कसा काढायचा याची. तो आमच्याजवळ आहे. तो मार्ग दाखवण्याचं  काम आम्हाला करायचंय. त्याची तैयारी करण्याचा संकल्प आज होतोय.
  अशा प्रकारचा विश्वास, प्ररेणा, स्फुरण आज आम्हाला मिळतंय   कारण 'राम सर्वांचे आहेत आणि सर्वांमध्ये राम आहेत. " ही अनुभूती सरसंघचालकांना मिळाली ती त्यांच्या वाणीतून त्यांनी प्रगट केली.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण सुध्दा तेवढ्याच तोलामोलाचं होतं.ते म्हणाले की,
" आज पूर्ण भारत राममय झाला आहे. भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत  तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे . कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.
  हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे 
जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत
भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत . देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे. राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पणही होते आणि तर्पणही  होते, संघर्षही होता आणि संकल्पही होता. ही अनुभूती पंतप्रधान मोदींना आली तीच त्यांनी प्रांजळपणे मांडली.
देशाच्या संस्कृतीविषयी,सभ्यतेविषयी गर्वाने बोलणारा पंतप्रधान यानिमित्ताने सर्वांनी पाहिला.हे त्यांचे सहजोद्गार होते जे सत्यस्वरूपाची अनुभूती घेतल्याशिवाय मुखातून बाहेर पडत नाहीत.म्हणूनच अयोध्येत झालेली दोन्ही भाषणे ही आत्मारामांची अमृतवाणीच होती.असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.
                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.



Saturday, August 1, 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक


वाचकहो, 
मन:पूर्वक नमस्कार!
   लोकमान्य टिळक स्मृती शताब्दीचं औचित्य साधून टिळक जयंती ते पुण्यतिथी या दहा दिवसात त्यांच्या जीवनातील एकेका पैलूचे अध्ययन करून मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतांना विलक्षण त्रेधा उडाली कारण लोकमान्य टिळकांचा एक पैलू उलगडायचे म्हटले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील असंख्य अगणित आयाम कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उमलू लागतात त्यातून नेमकं काय मांडता येईल यासाठी ही त्रेधातिरपीट होत होती. परंतु आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही मालिका पूर्ण झाली.आपल्या सूचनांचे स्वागत करून आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.
     विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन ।
     स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।। 
 या श्लोकात जे म्हटलंय यांची तंतोतंत अनुभूती हे लिखाण करतांना आली. राजा आणि विद्वान यांची खरोखर तुलना होवू शकत नाही.कारण राजाचा सन्मान त्याच्या राज्यात होतो पण विद्वान लोक सर्व स्थळी पूजनीय असतात.अष्टपैलू, अष्टावधानी हे शब्द लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना अपुरे पडतात.टिळक हे लोकमान्य,लोकोत्तर युगपुरुष ठरले यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं व्यक्तित्व,कर्तृत्व व दातृत्व बहुआयामी अशा स्वरूपाचं होतं.लोकजागृती, लोकसंग्रह,लोकसंघटन,,या त्रिसूत्रीच्या आधारावर ते लोकमान्य ठरले.
१८८० ते १९२० असा तब्बल ४० वर्षाचा काळ त्यांनी सार्वजनिक जीवनात व्यतित केला.त्यात त्यांनी केलेल्या बहुविध कामांमधूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याची साक्ष मिळते.एक हुशार  व विद्यार्थी प्रिय शिक्षक ते लोकमान्य नेता म्हणून त्यांचा झालेला प्रवास जगातील विचारवंतांना देखील अचंबित करणारा होता.सव्यसाची शिक्षक,संस्थाचालक, झुंजार पत्रकार, व्यासंगी संशोधक,निस्पृह देशभक्त, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता,परखड देशभक्त, अर्थशास्त्रज्ञ,अभ्यासपूर्ण लेखन, धर्माभिमानी, संस्कृती रक्षक,राष्ट्रहित जोपासणारा धुरंधर राजकारणी,वेदान्तापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांवर भाष्य करण्याची जाण असणारा विश्लेषक, कलेची आवड असणारा रसिक अशी अगणित रूपं लोकमान्यांच्या जीवनात ठळकपणे समोर येतात.म्हणूनच टिळक हे बहुआयामी व्यक्तिमत्व असल्याचे अनुभवाला येते.त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी देशविदेशातील अनेक विचारवंतांनी विस्तृतपणे विश्लेषण केले आहे.एवढच नाही तर अनेक कवींनी त्यांच्यावर कवने, पोवाडे,आरती,अष्टके संस्कृत श्लोक आदि विविध प्रकारे रचना केल्या आहेत.आपापल्या परीने लोकमान्यांचे व्यक्तिमत्व साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील कवी गोविंद यांनी टिळकांच्या मृत्यूनंतर केलेली रचना मनाला विशेष स्पर्श करून जाते.
आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद
या कवितेतून लोकमान्यांच्या कांहीं पैलूंवर ते नक्कीच प्रकाश टाकतात. लिहीण्यासारखे खूप आहे.त्यांच्या पावन स्मृती जागवणे आजच्या स्थितीत तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकमान्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आज लेखणीला विराम देतो!!!!! धन्यवाद 🙏
                                  शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Friday, July 31, 2020

टिळकांचा परराष्ट्रीय दृष्टीकोण




संपूर्ण भारतीय स्वातंत्र्यच नव्हे तर स्वराज्याची आग्रही मागणी करून त्यासाठी अहोरात्र झटणारे लोकमान्य टिळक सर्वांनाच माहित आहेत. देशबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारशी टक्कर घेणारे, परखड राष्ट्रवाद मांडणारे लोकमान्य  टिळक सर्वसामान्यांना नक्कीच आवडतात. पण,भारताची राजकीय चळवळ प्रभावी करताना जागतिकस्तरावर भारताचे प्रश्न समजून सांगण्यात टिळकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली याबद्दल कोणी फारशी दखल इतिहासात घेतलेली दिसत नाही.टिळकांच्या जीवन चरित्रातला हा दुर्लक्षित पैलू समजून घेणे आवश्यक आहे.
   आंतरराष्ट्रीय जगतात लोकमान्यांचे अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. दळणवळणांच्या साधनांचा विकास झालेला नसतांनाही  त्यांनी त्यांच्या काळातील सर्व समस्यांना तोंड दिले आणि त्या सुटाव्यात यासाठी त्यांनी सरकारशी सतत संघर्ष केला. हे करताना त्यांनी भविष्याचा वेध घेतला आंतराराष्ट्रीयस्तरावर आपली बाजू बळकटपणे मांडली.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या चळवळी भारतातच कराव्यात. यासाठी इंग्लडमध्ये शिष्टमंडळे पाठविण्याची गरज नाही असे टिळकांचे मत होते. परंतु पहिले महायुध्द पेटले. इंग्लडची ठिकठिकाणी पीछेहाट होऊ लागली. त्यांचे सेनादल अपूरे पडू लागले. ब्रिटीश सरकारच्या अडचणीचा फायदा घेण्याचे टिळकांनी ठरविले. भारताकडून इंग्लडला मनुष्यबळ, युद्धसामुग्रीच्या उत्पादनात मदत केली जात होती. स्वराज्याचे हक्काची रोखठोक व्यवहारी मागणी त्यांनी प्रत्यक्षात राज्यकर्त्या इंग्रजांकडे आणि त्यांच्या सामान्य मतदार नागरिकांकडे करण्याचे ठरविले आणि इंग्लडमध्ये प्रत्यक्ष जाऊनच हक्क मागण्याचा निर्धार केला. मात्र, यात अडचण होती त्यांनी भोगलेल्या शिक्षेची. राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगलेल्या टिळकांना इंग्लडला जायची परवानगी मिळणे कठीण होते. त्यात युद्धाची धुमश्चक्री सुरू असल्याने इंग्रजांनी राजकीय कारणांमुळे इंग्लडला जाण्याची परवानगी नाकारली. या कोंडीतून त्यांनी मार्ग काढला.
  टिळकांच्या सूचनेवरून वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशिऑलॉजिस्ट हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. त्यातून भारताच्या दारिद्रयाचे विदारक चित्र आकडेवारी ते मांडत आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे अग्रलेखांतून आग्रहाने प्रतिपादन करीत. टिळकांच्या सूचनेवरून भारतातून इंग्लडमध्ये जाणा-या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देण्याची योजना वर्मा यांनी सुरू केली. टिळकांनी योग्य तरुणांची शिफारस करावयाची असे ठरले.
स्वा.सावरकरांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लडमध्ये जावयाचे होते, तेव्हा टिळकांच्या शिफारशीमुळे वर्मा यांनी सावरकरांना शिष्यवृत्ती दिली आणि इंडिया हाऊसमध्ये राहण्याची सोय केली. इंग्लंडमध्ये आणि युरोपातील देशांतही भारताच्या राजकीय समस्येची माहिती देण्यासाठी कोणाला तरी पाठवावे, असे टिळकांनी सुचविले. वर्मा यांच्या सहका-यांमध्ये मॅडम कामा या पारशी विदुषी होत्या. त्यांनी पूर्वी दादाभाई नौरोजी यांचे सचिव म्हणून काम केले होते. त्यांनी १९०७ मध्ये जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथील जागतिक समाजवादी परिषदेत स्वतंत्र भारताचा ध्वज फडकविला. मॅडम कामाच्या या कर्तृत्त्वाचे टिळकांना समाधान वाटले.
त्यानंतर त्यांनी अमेरिकेचा दौरा करून भारताची बाजू मांडली. टिळकांचे बंगालच्या फाळणी विरोधी चळवळीतील सहकारी लाला लजपतराय यांनी केलेला अमेरिकेचा दौराही फार महत्त्वाचा होता.
लोकमान्यांच्य क्रांतीकारकांशी संबंध असे. अर्थात ते त्यांच्या कार्यात प्रत्यक्ष सामील झाले नाहीत. शस्त्र उचलून स्वराज्य निश्चित मिळेल अशी खात्री झाल्याशिवाय आपण तो मार्ग स्विकारणार नाही, असे ते म्हणत. टिळकांनी त्यावेळी मुंबईत असलेल्या रशियन राजदूताशी संपर्क साधला होता. ही माहिती अगदी प्रथम कै.म.म.दत्तोपंत पोतदार यांनी प्रसिद्ध केली. बडोदे सरकारच्या सैन्यात असलेल्या माधवराव जाधव यांना स्वित्झर्लंडमध्ये लष्करी शिक्षणा‌स पाठविण्याची खटपट लोकमान्यांनी केली. जाधव यांना अमेरिकेतील सैनिक विद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांना तेथे सर्व लष्करी प्रशिक्षण देण्यात आले.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर पॅरिसमध्ये शांतता परिषद भरणार असे जाहीर झाले. फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको हे या परिषदेचे अध्यक्ष होते. टिळकांनी १० मार्च १९१९ ला क्लेमेंको यांना विस्तृत निवेदन पाठविले आणि भारताच्या प्रतिनिधीस शांतता परिषदेस हजर राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. ती मागणी मात्र मान्य झाली नाही. जगात शांतता नांदावयाची असेल, तर आशियातील सर्व राष्ट्रांना स्वराज्य उपभोगावयास मिळाले पाहिजे. स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थान जागतिक शांततेसाठी शक्य ते सर्व करील, होमरूल डेप्युटेशनचे एक सदस्य बॅ. वेलणकर यांनी पुढील आठवण सांगितली होती. टिळक वेलणकरांना म्हणाले, लेबर पार्टीशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला कारण मला असा विश्वास वाटतो, की आपल्याला स्वराज्य मिळविण्यासाठी लेबर पार्टीचे मोलाचे साह्य होईल. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकमान्य टिळकांचेच सूत्र पुढे चालविले.
      टिळकांचा दृष्टीकोन विशाल आणि व्यापक होता. त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांना परदेशामध्ये दौरा करण्यासाठी पन्नास हजार रूपये देऊ केले. टागोर टिळकांना म्हणाले, ''मी राजकीय कार्यकर्ता नाही , मी आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकणार नाही.'' टिळकांनी त्यांना कळविले, ''तुम्ही राजकीय प्रचार करावा, अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला मी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी मानतो. तुमचे काव्य, तुमची भाषणे यातून भारताची जी ओळख जगाला होईल तीच मला फार महत्त्वाची वाटते.''
  ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतात उठाव झाल्यास लष्करी शिक्षण घेतलेल्यांना नेतृत्त्व करता येईल या उद्देशाने भारतीय तरूणांना रशियात तसे शिक्षण घेण्याची संधी मिळेल का याची चाचपणी लोकमान्य टिळकांनी केली होती. तत्कालीन रशियन राजदूतांच्या अहवालांतून याविषयी नोंद आढळते. लोकमान्यांचा हा मनोदय पुढे सिद्धीस गेला नाही कारण खुद्द रशियातच १९०५ मध्ये क्रांती झाली आणि ब्रिटन-रशिया यांमध्ये सहकार्याचे वारे वाहू लागले.
   डॉ. खानखोजे हे सुदधा टिळकांच्या प्रोत्साहनाने परदेशी गेले होते. तेही जपानमार्गे अमेरिकेस मुख्यतः युद्धशास्त्र शिकण्यासाठी गेले. जागतिक स्तरावरील वजन लक्षात घेता भारतीयांच्या प्रश्नाची जगाला मु्ख्यत्त्वे इंग्लडमधील ब्रिटीश सरकारला जाण करून देणारे लोकमान्य टिळकच होते.
लोकमान्य टिळकांच्या या अनोख्या दृष्टीपुढे मनापासून नतमस्तक!!!!! 
             शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Thursday, July 30, 2020

संगीतप्रेमी लोकमान्य टिळक


राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, न्यायालयीन खटले या सर्व धावपळीच्या दिनक्रमात लोकमान्य टिळक आपला वाचन व लिखाणाचा व्यासंग जोपासत असतांना त्यांना असलेली शास्त्रीय गायन व नाट्यगीताची आवडदेखील जोपासत होते.गणेशोत्सवाच्या निमीत्ताने त्यांच्या वाड्यात अधूनमधून गाण्याच्या मैफिली रंगत असत. एकदा नारायण राजहंस हा बालक आपल्या माणसांसोबत टिळकांच्या घरी गेले असता तो एक बंदीश गात असतांनाच टिळकांनी ते ऐकले व त्यांच्या तोंडून ' अरे हा तर बालगंधर्व ' हे सहजोद्गार निघाले.तोच नारायण पुढे बालगंधर्व म्हणूनच प्रसिध्द झाला.
एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने टिळक रहात असलेल्या गायकवाडवाड्यात रात्री बरीच गर्दी जमली होती.संगीत नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, यांच्याशी टिळकांचे स्नेहाचे संबंध होते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचं गायन होणार होतं. लोकमान्य टिळक मंडालेहून परतले त्याला एक वर्ष झालं होतं म्हणून त्यावर्षीच्या उत्सवात बखलेबुवांचं गाणं व्हावं, असं कृष्णाजी खाडिलकरांनी लोकमान्यांना सुचवलं होतं. लोकमान्यांना बखलेबुवांबद्दल प्रचंड आदर होता, त्यामुळे त्यांनी खाडीलकरांची ही सूचना मान्य केली. खुद्द लोकमान्यांनी दिलेलं आमंत्रण बखलेबुवांनीही लगेच स्वीकारलं. कार्यक्रम रात्री ठीक दहा वाजता सुरू झाला. सुरुवातीला मा. कृष्णरावांचं गायन झालं. नंतर बालगंधर्व गायला बसले. काही नाट्यगीतांनंतर लोकमान्यांच्या गुणवर्णनपर ’जो लोककल्याण साधावया’ हे मालकंसातलं पद ते गायले. या दोन्ही तरुण गायकांना श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. दोन्ही गायक श्रोत्यांचे लाडके, आणि त्यांच्या नाट्यगीतांनी तमाम गानरसिकांना वेड लावलं होतं. मध्यरात्री एक वाजता भास्करबुवा बैठकीवर आले. त्यांनी गायनाला सुरुवात केली, आणि प्रेक्षकांमध्ये चुळबूळ सुरू झाली. बुवांना हा अनुभव नवीन नव्हता. बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि बुवा या तिघांचे जलसे भारतभर सतत होत असत. या जलशांना तोबा गर्दी उसळत असे. पण प्रत्येक ठिकाणी बालगंधर्व आणि मा. कृष्णराव यांच्या पदांना भरपूर दाद मिळे. बुवांचं शास्त्रीय गायन सुरू झालं, की श्रोत्यांचा बैठकीतला रस ओसरे. बुवांच्या नाटकातल्या पदांना मात्र जोरदार दाद मिळे, त्यांनी नाट्यगीतं गावीत, असा आग्रह होई. नाट्यगीतांनी श्रोत्यांना वेड लावलं, तरी शास्त्रीय गायनात आता त्यांना रुची राहिली नव्हती, याचं बुवांना फार वाईट वाटे.
गायकवाडवाड्यात त्या रात्री भास्करबुवांचं गाणं सुरू होताच श्रोत्यांनी गडबड करायला सुरुवात केली. अनेकजण बुवा गात असतानाच उठून जाऊ लागले. बैठकीला लोकमान्य उपस्थित होते. भास्करबुवांसारख्या थोर गायनाचार्यांचा असा अपमान त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. ते उभे राहिले, आणि श्रोत्यांना म्हणाले, "आजचा कार्यक्रम गणपतीउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा यांच्या गायनाला सुरुवात झालेली आहे, आणि ते तुम्ही शांतपणानं ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कोणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं, पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं, ते वाटतं म्हणजे असं की, त्यांची कला फार मोठी आहे, आणि त्याबद्दल विचार करण्यासारखं खूप आहे. आणि म्हणून भास्करबुवांना मी मुद्दाम तसदी दिली. ते इथे आले, आणि कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. त्यांनी उत्तमप्रकारे काम केलं आहे, याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं, प्रत्यक्ष गजाननस्वरूप  भास्करबुवा बखले यांच्या घातल्याचे कार्यक्रम ऐकण्याचा प्रसंग वारंवार येऊ द्यावा, अशी प्रार्थना मी करतो."
टिळकांच्या आवाहनानंतर श्रोते अर्थातच शांत झाले, आणि पुढचा कार्यक्रम उत्तम पार पडला. बुवा अडीच तास गायले. गाणं संपल्यानंतर लोकमान्यांनी सर्वांना घरात नेलं, आणि बुवांच्या गाण्याची मनापासून प्रशंसा केली. मोठ्या प्रेमानं जरीचं उपरणं लोकमान्यांनी बुवांच्या अंगावर घातलं. नंतर लोकमान्य कंदील घेऊन उंबर्‍या गणपती चौकापर्यंत बुवांना सोडायला आले होते.या एकाच प्रसंगांतून लोकमान्य टिळकांचं संगीत प्रेम किती होतं हे लक्षात येतं. संगीत कलेची आवड जोपासत कलाकारांना प्रोत्साहन देणारे लोकमान्य आपणांस नक्कीच वंदनीय आहेत!!!!!!!!
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Wednesday, July 29, 2020

लोकमान्यांचा अध्यात्मिक अधिकार


आयुष्यभर सार्वजनिक जीवनात वावरत असूनही लोकमान्य टिळक  मूलभूत अध्यात्मिक अध्ययन व  चिंतनापासून कधीच दूर गेले नाहीत.याउलट अध्यात्म आणि राजकारण,अध्यात्म आणि राष्ट्रवाद याची सांगड घालून अनेक तरूणांना त्यांनी त्याकाळात निस्पृह देशभक्तीसाठी प्रवृत्त केले.निष्काम कर्मयोग हा त्यांच्या समग्र विचारांचा गाभा होता.त्यांचा प्रत्येक व्यवहार याच दिशेने जाणारा होता.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून त्यांचा अध्यात्मिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना येते.
       महर्षी योगी अरविंदांनी एका ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की, ‘टिळकांनी एकदा ध्येय निश्चित केले की, कठीण परिस्थितीला तोंड देत ध्येयप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून ते गाठायचे. त्यांची इच्छाशक्ती पोलादासारखी होती. लोकमान्यांचे सारे जीवन ब्रिटिशांशी झगडण्यात गेले. अन्य क्रांतीकारकांप्रमाणे त्यांनीही त्यांचे सर्वस्व राष्ट्रासाठी दिले. हे करतांना त्यांनी स्वत:च्या घरादाराची व कुटुंबिय यांचीही चिंता केली नाही.
१९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्‍वनाथही प्लेगला बळी पडला. एवढे होऊनही लोकमान्य विचलित झाले नाहीत. मुलाच्या मृत्यूच्याच दिवशी सांत्वन करायला गेलेले जावई वि.ग. केतकर यांना लोकमान्य म्हणाले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्‍या जाव्या लागतात, त्याप्रमाणेच हे झाले !”
     टिळक विचार हे स्वप्नदर्शक नसून, त्याला तात्त्विक अधिष्ठान, आधुनिकता आणि वास्तवतेची कास आहे. लोकमान्य टिळकांचे ओरायन, आक्र्टिक होम इन वेदाज्, ब्रrासूत्र, वेदांग ज्योतिष आणि गीतारहस्य या स्वतंत्र संशोधनात्मक लेखनाचा केवळ भारतीय नव्हे, तर पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गौरव केला. टिळकांच्या पहिल्या दोन ग्रंथांमुळे भारतीय जनतेत स्वत्व जागृत झाले.
टिळक युगाच्या इतिहासाचा थोडक्यात मागोवा घेतल्याखेरीज टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणो अवघड आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांची धाव सुखोपभोगाकडे आहे. त्याप्रमाणे या पूर्वेकडील लोकांची नाही. `आयुष्य सुखात घालवण्याच्या साधनांपेक्षा आयुष्याचे परिणामी साफल्य कसे होईल’, हा विचार डोळयांसमोर ठेवून कर्मयोगाच्या बैठकीवर त्यांनी राष्ट्ररचना केली आणि राष्ट्राचे रूप निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न केला.
  लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागल्यावर त्यांना गुप्‍तपणे मंडाले येथील तुरुंगात नेण्यात आले. तेथील जीवन म्हणजे सहा वर्षांचा दारूण एकांतवास. तेथे त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरी त्याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. त्यांना तेथे सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून रहावे लागे. अशा स्थितीत बौद्धिक काम करणे अशक्य होते. तरीही त्यांनी बौद्धिक परिश्रम घेऊन `गीतारहस्य’ हा जगाला थक्क करून सोडणारा ग्रंथरूपी चमत्कार केला.
   शसुखवादाचा सिद्धांत हा अधिभौतिक (Positive) सिद्धांत असून गीतेचा नीतिसिद्धांत आध्यात्मिक आहे व अधिभौतिक सिद्धांतापेक्षा ज्येष्ठ आहे. जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांट आणि ब्रिटिश नीतिवेत्ता टी. एच. ग्रीन हे आध्यात्मिक नीतिशास्त्राचा पुरस्कार करतात व गीतेचा सिद्धांत त्यांच्या विचारांच्या जवळ येणारा आहे, असे टिळक सांगतात. 
मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे.
जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हाच त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधार होता.मोक्षाप्रत जाणारा अध्यात्ममार्ग हा केवळ तत्त्वचिंतन अथवा तपश्चर्येतून जात नाही तर निष्काम कर्मयोगातूनही मोक्षाप्रत जाता येते हे त्यांनी आपल्या विचारातून आणि व्यवहारातून सिध्द केले.अशा महान कर्मयोगी टिळकांच्या चरणी हे विचार पुष्प सादर समर्पण!!!!!!
                                           शशिकांत घासकडबी, नंदुरबार.


Tuesday, July 28, 2020

निष्णात कायदेतज्ञ टिळक


      लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे टिळक हे सर्वोत्कृष्ट वकीलच नव्हे तर निष्णात कायदेतज्ञ होते.वकील हे केवळ समोर आलेल्या खटल्याच्या कायदेशीर बाबी तपासून आपल्या अशिलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात पण टिळकांनी अनेकदा कायद्यालाच आव्हान देवून त्या कायद्यात सुधारणा करण्यास ब्रिटिश सरकारला भाग पाडले.  
१८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली
संमतिवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धामधूम माजली, तिच्यात कायदाविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले. सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारिली. या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत होती म्हणून डॉ. भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा लेख लिहिला. त्या वेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला. टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले, तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी एक संस्था स्थापण्याचा ते विचार करीत होते. त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती. उदा., सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादीअनेक सुधारणांचा त्यात समावेश होता.
पुण्यातील पंचहौद मिशनतर्फे १८९० मध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. त्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता. हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली. काहींनी अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला. या सर्व पाप्यांना शिक्षा कुणी द्यावयाची, हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली. अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला; यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले.
हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. 
२२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले; त्यामुळे त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.
शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. 
या सुमारास टिळकांना ताईमहाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लागला. केवळ मित्रप्रेमामुळे हे प्रकरण उद्‌भवले. यात इंग्रज अधिकारी, कोल्हापूरचे संस्थानाधिपती व बळवंतराव नागपूरकर यांनी टिळकांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने, खोटी साक्ष देण्याच्या आणि खोटे दस्तऐवज करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी खटला केला; पण टिळकांची सर्वांमधून निर्दोष मुक्तता होऊन त्यांनी दत्तक घेतलेल्या जगन्नाथमहाराज यांची वारसदार म्हणून पुढे निश्चिती झाली.
जुलूम तो जुलूम; मग तो कायदेशीर असो  किंवा बेकायदेशीर  असे परखड मत ते व्यक्त करीत.
भारतमंत्री सर एडविन माँटेग्यू यांनी २० ऑगस्ट १९१७ रोजी भारताला भेट देऊन अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळे व पुढारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी टिळकांचीही व्यक्तिशः भेट घेतली. या वेळी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या. टिळक इंग्लंडमध्ये असताना रौलट कायदा जाहीर झाला होता व त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळातून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. ‘गांधीच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते’; असे उद्‌गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले.
१९१९ मध्ये अमृतसर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्थान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे; माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अपुऱ्‍या, असमाधानकारक व निराशाजनक आहेत, असा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले; परंतु सुधारणा अपुऱ्‍या असल्या तरी त्यांचा त्याग करू नये; आज जे मिळेल तेवढे तर पदरात घ्याच, पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका, असा टिळकांचा सल्ला होता.
व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले;
अशाप्रकारे अनेक खटले चालवून भारतीय जनतेला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.अन्यायकारक जुलमी कायद्याच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला
अशा महान कायदेतज्ञ टिळकाना लक्ष लक्ष नमन!!!
                                 शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

Sunday, July 26, 2020

टिळकांचे अर्थशास्त्रीय चिंतन


टिळकांचे अर्थशास्त्रीय चिंतन
लोकमान्य टिळक हे  अर्थशास्त्रज्ञ नव्हते. परंतु प्रत्येक विषयाचे सखोल अध्ययन करून त्याविषयी मत व्यक्त करणे हा टिळकांचा  स्थायीभाव होता.त्यांनी त्याकाळात मांडलेले अर्थविषयक विचार आजही तंतोतंत लागू पडतात.
   याबाबत  दी इकॉनॉमिस्ट' या पुस्तकात  टी. व्ही. पर्वते यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे.ते म्हणतात- ''अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी अर्थशास्त्र हा विषय तज्ज्ञांवर सोडला होता, टिळकांनी मात्र तसे केले नाही. राजकीय अर्थकारणाच्या खाचाखोचा पूर्णपणे जाणून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी जनमत तयार केले.''
 तसेच आचार्य जावडेकर यांनी  ''हिंदवी स्वराज्य हा केवळ वरिष्ठ वर्गाच्या स्वाभिमानाचा किंवा संस्कृतिरक्षणाचा अथवा वैभवाचा प्रश्न नसून, तो सामान्य जनतेतील कोट्यवधी जिवांच्या पोटाचा, प्राणधारणेचा आणि क्लेशरहित व रोगरहित जीवनाचा प्रश्न आहे.''याची लोकांमध्ये राजकीय जाणीव रुजवली ती लोकमान्यांनी असे नमूद केले आहे. ब्रिटिशांनी आणलेली कायदा आणि सुव्यवस्था, जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण, परचक्रापासून रक्षण या तथाकथित फायद्यांना काहीही अर्थ नव्हता. कारण भारताचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी ब्रिटिश सरकार कुठलीही धोरणं आखत नव्हतं. तसंच भारतीय भांडवलाचा आणि असलेल्या उद्योगधंद्यांचा क्षय होऊन भारत कायमस्वरूपी पिढ्यान् पिढ्या भयानक गरिबीत ढकलला जाईल, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. लोकमान्यांनी अत्यंत मार्मिकपणे याचं वर्णन  त्यांच्या एका अग्रलेखात केलं आहे- ते म्हणतात,"काही काळापर्यंत ईश्वराने दयाळू होऊन आमच्यावर राज्य करण्याकरिता हे कोणी तरी दैवशाली पुरुष पाठविले आहेत, असा सर्वांचा समज झाला. इंग्रजांच्या राज्यात आंधळ्याने काठीस सोने बांधून काशीपासून रामेश्वरापर्यंत जावे असे लोक म्हणू लागले; परंतु दारूचा अंमल ज्याप्रमाणे फार वेळ टिकत नाही, त्याचप्रमाणे राज्यक्रांतीपासून उत्पन्न झालेला हा भ्रमही उत्तरोत्तर दूर होत चालला. आंधळ्याने काठीस सोने बांधून जावे खरें; पण सोनेच उत्तरोत्तर दुर्मिळ होत चालले ही गोष्ट दिवसेंदिवस लोकांच्या जास्त लक्षात येऊ लागली.
सारांश, इंग्रजी अमलाने आमची दृष्टी जी अगदी दिपून गेली होती, ती आता सुधारत जाऊन आमच्यावर जुलूम कसा होतो व आमचे नुकसान कशाने होते हे शोधण्यास आम्ही लागलो आहोत ''.
अर्थतज्ज्ञांची Drain Theory, लोकमान्य अशाप्रकारे सोप्या भाषेत लोकांपर्यंत नेत होते आणि ब्रिटिश भारताच्या आर्थिक प्रश्नांवर लक्ष वेधून स्वराज्यासाठीच्या राजकीय लढ्याला धार चढवत होते. 'केसरी'तील आपल्या सहज-सोप्या मराठी लेखांतून लोकमान्यांनी अनेक विद्याक्षेत्रांची दारं सामान्य मराठी वाचकांसाठी किलकिली केली. अर्थशास्त्र हाही त्यातील महत्त्वाचा विषय. शेतसारा, कररचना, उद्योगधंदे, शेती, दुष्काळ, गरिबी, कामगार, चलन अशा बहुविध आर्थिक विषयांवर लोकमान्यांनी मुबलक लिखाण केलं.
आर्थिक प्रश्नांच्या माध्यमातूनही ते राजकीय असंतोष निर्माण करत होते. परतंत्र देशातील लोकांचे नेते, या नात्याने होत असलेल्या आर्थिक अन्यायाला वाचा फोडणे, त्यावर तत्कालीन उपाय शोधून लोकांचा त्रास कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणे, भारतीयांचे आर्थिक हितसंबंध जपणे, या कार्यातून त्यांनी भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात केली. त्याचा राजकीय दृष्ट्या वापर करून घेतला. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार वगैरे माध्यमातून लोकांची मोठ्या दीर्घकालीन लढ्याची तयारी पक्की करून घेतली. त्यांनी त्या पायावर स्वराज्याची लढाई उभी केली!
पाऊस न पडल्याने दुष्काळ पडतो, यासंबंधाने कोणाचाच वाद नाही. वादाचा प्रश्न असा आहे की, दुष्काळाशी टक्कर देण्याचे सामर्थ्य रयतेत कां असू नये? दुष्काळाच्या वेळी निर्वाह चालविता येण्याइतकी शिल्लक प्रजेपाशी कां नसावी? दुष्काळामुळे येथे धान्य उत्पन्न झाले नाही तर मद्रास, बंगाल, ब्रह्मदेश या प्रांतांतून तेथील लोकांना पुरून आम्हांस पुरेसे धान्य यंदा उपलब्ध झालेले आहे; पण ते धान्य विकत घेण्यास आमच्या रयतेपाशी पैसेच नाहीत.वर्षाच्या अखेरीस सरकार-सारा देऊन टाकल्यावर रयतेपाशी काहीच शिल्लक न राहून नवीन सालच्या प्रारंभी धुतलेल्या तांदळाप्रमाणे आम्हांस उघडे-नागडे का व्हावे लागते?.हिंदुस्तानच्या दारिद्र्याचे कारण सांप्रतची राज्यव्यवस्था होय.'दुष्काळ ही नैसर्गिक घटना नसून राजकीय कारणांमुळे तो घडतो, हा मुख्य सिद्धांत लोकमान्यांनी मांडला.       टिळकांचा हा विचार अशाप्रकारे आजही जगात अनेक देशांबाबत लागू होतो आणि त्यांची अर्थविषयक इतर मांडणी ही भारताच्या आजच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भातही उपयुक्त ठरते, हे त्यांच्या विचारांचे महत्त्व आहे.
भारतातील ब्रिटिश राज्यव्यवस्था गरिबांवर कराचा बोजा टाकते. साम्राज्यातील इतर खर्चही त्यातून निभावते. इकडचे जुने उद्योग मेले आणि नवे वाढणार नाहीत, याची व्यवस्था केली जाते. दरवर्षी अशी दिवसाढवळ्या होणारी लूट, पुन्हा भारतात कर्जाऊ रक्कम म्हणून आणली जाते किंवा गुंतवली जाते आणि व्याजाच्या रूपाने किंवा नफ्याच्या रूपाने पुन्हा एकदा पैशाचा ओघ देशाबाहेरच जातो.अशा दुष्टचक्रात देश, स्वराज्य नसल्याने अडकून पडला आहे, असे टिळक म्हणत. आज पूर्ण राजकीय स्वातंत्र्याच्या काळातही काहीशा याच पद्धतीने इथून लुटलेला काळा पैसा पुन्हा एकदा एफ.पी.आय किंवा एफ.आय.आय.च्या स्वरूपात नफेखोरीसाठी परत येण्याची शक्यता राहते. त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीच लाभ होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. योग्य पद्धतीने येणाऱ्या परकीय भांडवलाला मात्र टिळकांचा विरोध नव्हता, किंबहुना परकीय भांडवल वापरलं जावं, याविषयी ते आग्रही होते.
महाराष्ट्राची जमीन ही साखर उद्योगाला योग्य आहे, हे टिळकांनी पहिल्यांदा मांडलं. 'कोणत्याही देशाची सांपत्तिक स्थिती निव्वळ शेतीवरच अवलंबून असल्यास ती सदासर्वकाळ चांगली राहणे संभवनीय नसते' असं म्हणून शेती किफायतशीर करणं आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचं प्रमाण कमी होऊन त्यांच्या रोजगारासाठी उद्योगधंदे हाच पर्याय ठरतो, हा त्यांनी मांडलेला विचार आजही कालसुसंगत आहे. 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे त्यांनी जे लिहिलं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतले. 'पैसा फंड'सारख्या उपक्रमांना प्रेरणा देऊन उद्योगांसाठी भांडवल उभं केलं. औद्योगिक परिषदा भरवल्या. काडेपेट्यांचा कारखाना, ग्लास कारखाना यांसारख्या लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, याची अनेक उदाहरणं आहेत. एम.एस.एम.इ.च्या संदर्भात त्यांचे विचार हे आजही राष्ट्रनिर्माणासाठी उपयुक्त आहेत. विखुरलेले लघु आणि मध्यम उद्योगधंदे उभारल्यानेच फ्रँको-जर्मनी युद्धानंतर जर्मनी पुन्हा एकदा आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकला, हे ते नमूद करतात.
ब्रिटिश साम्राज्यशाही ही मूलतः व्यापारी आणि आर्थिक आहे आणि मध्ययुगीन पंथीय आणि धार्मिक प्रेरणा त्यात नाहीत अथवा कमी आहेत असं टिळक म्हणतात. तसंच अशी अनिर्बंध आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाणारी सत्ता ही उभयपक्षी कशी घातक असते, हे ही ते सांगतात. कारण साम्राज्य हे अंतिमतः जेत्या राष्ट्रातीलही व्यापक हिताकडे दुर्लक्ष करून मोजक्यांचं आर्थिक हितसंबंध जोपासण्याचं एक साधन होतं, हे त्यांनी फार सोप्या रीतीने स्पष्ट केलं. या साम्राज्यामीमांसेची परिणती म्हणूनच टिळकांनी ब्रिटिश मजूर पक्षाशी जोडलेले संबंध आणि त्याच पक्षाच्या कारकिर्दीत पुढे भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, यावरून निश्चितच त्या मांडणीची सत्यता इतिहाससिद्ध आहे. आजच्या काळातही अनिर्बंध आर्थिक सत्ता गाजवू पाहणाऱ्या चीनसारख्या देशाला ती मीमांसा लागू आहे.
अनेक शतकं भारतातील विविध महान तत्त्वचिंतकांनी तयार केलेल्या वैचारिक बैठकीमुळे ऐहिक जीवनाच्या उन्नतीबाबत भारतीय मन उदासीन झालं होतं. टिळकांच्या 'गीतारहस्या'ने ती विचारपद्धती बदलून ऐहिकता आणि आध्यात्मिकता यांच्यात भांडण नसून, ऐहिक उन्नती सुद्धा साधली पाहिजे, हा विचार विद्वत्तापूर्वक मांडला. भारतीय मानसिकतेसाठी हा बदल क्रांतिकारक होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानातील 'पॉझिटिव्हिझम' या तत्त्वप्रणालीमुळे युरोप विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे गेला आणि त्याची परिणती त्याच्या आर्थिक सुबत्तेत झाली. टिळकांना भारतानेही त्याचा अंगीकार करून आपली प्रगती साधावी असं वाटत होतं. परंतु त्याचबरोबर समाजधारणशास्त्र, नीतिशास्त्र या विषयांमध्ये मात्र ते 'पॉझिटिव्हिझम' आणि 'पुष्कळांचे पुष्कळ सुख' मांडणारे उपयुक्ततावादी नीतिशास्त्र नाकारतात आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा अंगीकार करतात. असा हा विचार आधुनिक भारतासाठी आणि जगासाठीही उपयुक्त ठरणार आहे. टिळकांच्या राजकीय अर्थविचाराचं मूळ अशा रीतीने त्यांनी 'गीतारहस्या'त मांडलेल्या तत्त्वविचारात आहे.
उदारमतवादावर आधारित जागतिक भांडवलशाही असो की शेतकरी-कामगारांची जागतिक सत्ता स्थापन करू पाहणारा कम्युनिझम या 'जगाचे कल्याण' करू पाहणाऱ्या विचारसरणी खरेतर श्रीमंत राष्ट्रांना आपल्या सोयीने वागून अधिक श्रीमंत, अधिक प्रबळ होण्यासाठी असतात, असा अनुभव टिळकपूर्व आणि टिळकांच्या काळात लोकांना इंग्लंडबाबत येत होता आणि टिळकोत्तर काळात तो आता आपल्याला अमेरिका आणि चीनबाबत येत आहे. श्रीमंत राष्ट्र आपल्या सोयीने 'मुक्त व्यापार' किंवा 'संरक्षणवाद' याची निवड करतात. राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून भारतही धोरणांची आखणी करू शकतो, हे टिळकांच्या अर्थविचाराला जे राष्ट्रवादाचे सातत्याने कोंदण होते. 
सद्यस्थितीत या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्यासाठी, स्वराज्याचे राजकीय, आर्थिक, अध्यात्मिक अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा टिळकविचारांकडे वळावे लागणार आहे. लोकमान्यांच्या या अर्थविचाराला विनम्र प्रणाम!!!!
                                  शशिकांत घासकडबी, नंदुरबार.

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...