Monday, April 25, 2022

अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्यिकांचं व्यासपीठ की राजकीय कट्टा

 

   नुकतेच मराठवाड्यातील उदगीर येथे साहित्य संमेलनाचं सूप वाजलं आणि आयोजकांनी सुटलो बुवा एकदाचे असं म्हणत समाधानाचा एक लांब सुस्कारा सोडला असेल. आयोजकांना कोणताही मोठा सोहळा सुखेनैव कोणतेही गालबोट न लागता पार पडला की समाधान वाटणारच अणि त्यात काही गैर नाही.परंतू संमेलनानंतर त्याविषयी जेव्हा त्याचं कवित्व सुरू होतं त्यात आयोजक उगाच भरडला जातो.खरंतर या चुका संमेलन अध्यक्षांपासून ते ते स्वतःला उगाचच साहित्यिक , विचारवंत मानून साहित्यासारख्या पवित्र क्षेत्रात लुडबुड करणाऱ्यांनी केलेल्या असतात.
एक काळ असा होता की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या साहित्यिकाचं अध्यक्षीय भाषण हे साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण मानले जाई पण दुर्दैवाने ही स्थिती आज नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते.माझ्यासारख्या सामान्य वाचक व साहित्यप्रेमी रसिकांची तरी हीच धारणा झाली आहे.नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनातील काही टवाळ भाषणांमुळे तर ही धारणा अधिक दृढ झाली आहे.एकूणच झालेल्या सर्व संमेलनाचा गोषवारा वाचत असतांना या संमेलनाने समाजाला काय दिलं ?असा प्रश्न मनात उपस्थित झाला. कोणताही नविन साहित्यिक विचार नाही, साहित्यातील नविन विचार प्रवाहाची साधक बाधक चर्चा नाही, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं असं उद्बोधन नाही किंबहुना साहित्यावर चर्चा कमी अन्  देशाला राष्ट्रीय विचार प्रवाहापासून दूर नेणारे कालबाह्य राजकीय विचार थोपविण्याचा प्रयत्न अनाहूतपणे आलेल्या तथाकथित पुरोगामी राजकीय विचारवंतांनी केला ही वस्तुस्थिती आहे.त्यापेक्षाही संमेलनाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांनी त्याचीच री ओढली ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.साहित्यात सर्व प्रकारचे विचार प्रवाह असणारच ते स्विकारले पाहिजेत .त्यातील प्रत्येक मुद्यावर खंडण मंडण व्हावे असा समतोल विचार संमेलन अध्यक्षांनी मांडणे अपेक्षित होते.पण सनदी अधिकारी राहिल्यामुळे त्या मानसिकतेतून एखाद्या राजकीय नेत्यांच्या जातीयवादी भाषणाची भलावण एका जेष्ठ साहित्यिकाने करावी यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?
यावेळी मला सहजच १९७५ सारी झालेल्या वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाची आठवण झाली.जेष्ठ साहित्यिका श्रीमती दुर्गाबाई भागवत संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या . नुकतीच देशात आणीबाणी जाहीर झालेली होती . अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याने संमेलन घेवूच नये अशी चर्चा सुरू झाली होती पण खूप विचारांती संमेलन ठरले . स्वागताध्यक्ष म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण होते.पण ते राजकारणा इतकेच साहित्यिक म्हणून लोकांना परिचीत होते. साहित्याच्या मंचावर साहित्याचीच चर्चा व्हावी ह्या विचारांचे ते होते.स्व .पु.ल.देशपांडे संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते.राजकारण म्हणून नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याने आणीबाणीच्या निषेधाचा ठराव दुर्गाबाईंनी त्यावेळी मांडला व या ठरावाचे निवेदन सरकारचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव चव्हाणांना साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत यशवंतराव चव्हाणांनी कोणतीही प्रतिक्रिया त्या मंचावरून दिली नाही.ही त्यावेळची परिस्थिती होती.सांगायचा मुद्दा असा की संमेलनाचे अध्यक्ष राजकीय दबाव मानत नव्हते आणि राजकारणी नेत्यांनाही त्याचे वैषम्य वाटत नव्हते.आता सर्वच काही बदललंय.असो.
अद्यापही सर्व सामान्य वाचक , साहित्य रसिकांना ही संमेलने राजकीय विचारांनी मुक्त रहावीत, हिंदुत्ववादी साहित्यापासून विद्रोही साहित्य विचारप्रवाहांवर सर्वांगीण चर्चा व्हावी,सर्व प्रकारच्या साहित्य कृतींचे स्वागत व्हावे साहित्य संमेलन हे केवळ आणि केवळ निखळ साहित्याच्या चर्चेचं व्यासपीठ व्हावं .एवढेच यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते.
                                              शशिकांत घासकडबी, नंदुरबार
                          ‌                         ९५२७१५३९२५

No comments:

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...