Friday, July 10, 2020

मैत्री आणि गप्पा


किती छान आहेत हे दोन शब्द.मनाला विरंगुळा देणारे,मनाचा थकवा दूर करणारे,मनाची प्रसन्नता वाढविणारे,आपलं एक वेगळं भावविश्व निर्माण करणारे.खरेपणाची चाड शिकवणारे,पारदर्शकतेची जाणीव निर्माण करणारे,' प्रेम' या शब्दाचा गहन व योग्य अर्थ सांगणारे,' विश्वास' या शब्दाची अनुभूती देणारे . किती तरी प्रकाराने या शब्दाचं विश्लेषण            करता येईल. . . . . . . . . . . . आयुष्यात ज्याने या दोन शब्दांची अनुभूती घेतली नसेल असा माणूस विरळाच म्हणावा लागेल. विलक्षण परस्परपूरकता या दोन शब्दांमध्ये गुंफलेली आहे.मैत्री आहे पण गप्पा झाल्या नाहीत असे कोणीही म्हणणार नाही.
सर्वप्रथम ऋग्वेदात 'मित्र ' या शब्दाचा उल्लेख आढळतो त्यालाच जोडून वरूण असा शब्द येतो.या दोन देवता ऋग्वेदात मानल्या गेल्या आहेत.' मित्रावरूण ' असा एकत्रित उल्लेख देखील या शब्दांचा केला जातो. या दोन्ही देवता जलावर अधिराज्य करतात. हे दोघेही कश्यप ऋषी व त्यांची पत्नी आदितीचे पुत्र आहेत. मित्र म्हणजे अथांग सागराची गहन सखोलता तर वरूण म्हणजे या विस्तीर्ण सागराचा पृष्ठभाग किंवा किनारा असे वर्णन केलेलं आहे.मित्र हा सूर्योदय असेल तर वरूण हा सूर्यास्त आहे.खूप विस्तृत वर्णन या दोन देवतांचं केलेलं असून या दोघांमध्ये द्वंद्व वाटत असलं तरी एक गहन मैत्रीचं अंतरंग त्यात आढळून येतं.व्यावहारिक जगात मैत्री आणि गप्पा यांच्यातलं नातं अशाच स्वरूपाचं आहे असं म्हणता येईल.
' अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करूण एव च ' श्रीमद् भगवद्गीतेत आपल्या प्रिय भक्तांचं विवेचन करताना भगवान श्रीकृष्णांनी कथन केलेला हा श्लोकार्ध आहे. या मध्ये
 भगवान श्रीकृष्ण सर्व प्राणीमात्रांशी द्वेषरहित व करूणायुक्त मैत्रीची अपेक्षा करतात.अशी मैत्री ही संवादातून होत असते. अशा सुसंगत मैत्रीचा आयुष्यात उपयोग काय ? यासाठी संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे त्याचा अर्थ पाहू या.
"जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं !
मानोन्नतिं दिशति पापमपा करोति !!
चांगली मैत्री ही आपल्या बुध्दीतला गोंधळ किंवा द्वंद्व संपवणे.मन पारदर्शक होवून आपल्याला खरं बोलायला शिकवते.त्यामुळे आपल्यातले दोष दूर होवून आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेते.या संदर्भात आणखी एक सुभाषित आहे ज्यांत मित्र या संकल्पनेचं चांगलं वर्णन केलंय.
चन्दनं शीतलं लोके,चन्दनादपि चन्द्रमाः !
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः !!"
 म्हणजे सर्वात थंड म्हणजेच शीतलता चंदनात असते.त्यापेक्षाही शीतलता चंद्रात असते.पण, एका चांगल्या मित्रात चंदन आणि चंद्रापेक्षाही जास्त शीतलता असते.त्यामुळेच ' मैत्री आणि गप्पा ' या दोन शब्दांमध्ये एक अनोखं नातं असतं.
प्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नाड शॉ मित्राविषयी म्हणतात
" The only service a friend can really render is to keep up your courage by holding up to you a mirror in which you can see a noble image of yourself. "
एखादी सेवा खरोखर देवू शकणारी सेवा म्हणजे मित्र. ज्यात आरशाप्रमाणे आपले प्रतिबिंब आपण धैर्याने पाहिले तरी आपली प्रतिमा आपल्यालाच उदात्त दिसेल.मैत्री किती निखळ असते याची ग्वाहीच जणू बर्नाड शॉ आपल्याला देतात.त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र आणि मैत्री यांचं स्थान महत्त्वाचं आहे याबाबत कोणतीही शंका नाही.मैत्रीची महती पटल्यानंतर त्याचा दुसरा अभेद्य भाग म्हणजे संवाद त्यासाठी वापरला जाणारा सोपा शब्द म्हणजे गप्पा.घनिष्ठ मैत्री आहे पण गप्पा होत नाही असं कधी होत नाही.सर्व प्रकारच्या वयोगटात आपल्याला मित्र असतात.बालवयात झालेले मित्र ज्यांना आपण लंगोटी यार म्हणतो.ही मैत्री खूप निरागस असते.या काळात आपल्या गप्पा पण निरागस असतात.समरस होवून खेळणे हा एकच भाव यामध्ये असतो.पण आयुष्यभर एखादा तरी लंगोटी यार आपल्याला लक्षात राहतो.शालेय जीवनात आपलं मैत्रीचं वर्तुळ वाढतं पण त्यातही आपली अभ्यासाची आवड,एखादा छंद यानुसार आपली मित्रांची चौकट ठरते.या वयात होणा-या गप्पा किंवा संवाद प्रामुख्याने अभ्यासाविषयी, शिक्षकांच्या शिकवण्याविषयी , एखाद्या आवडत्या खेळाविषयी असतात.मात्र हे स्वरूप आता विकसित तंत्रज्ञानामुळे बदलतंय हे निश्चित.मला आठवतंय आम्ही किशोरावस्थेत असतांना कधी मैदानी खेळ तर कधी बैठे खेळ खेळत असू पण संध्याकाळी कुठेतरी पायी फिरायला जाणे नियमित व्हायचे. त्यावेळी आपण वाचलेली एखादी गोष्ट किंवा सिनेमाची स्टोरी. हा गप्पांचा विषय असे.पण खरा मैत्री आणि गप्पांचा आनंद मिळतो तो महाविद्यालयीन जीवनात.या वयात प्रत्येकाची निरीक्षण शक्ती, सौंदर्यदृष्टी, एखाद्या विषयाचा आस्वाद घेण्याची क्षमता विलक्षण विकसित झालेली असते.जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन देखील विकसित होत जातो.मन संवेदनशील बनत जाते.त्यावर सभोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव देखील पडत असतो.पण वेव्हलेंथ जुळणारे मित्र मिळाले तर अशा सुसंगत मैत्रीमधील गप्पा आपलं आयुष्य घडवतात.अशा मैत्रीला काळ,वेळ,वय असे कोणतेही निकष लावता येत नाही.अशी मैत्री दीर्घकाळ टिकून राहते.मला आठवतंय की महाविद्यालयात शिकत असताना अ.भा.विद्यार्थी परिषदेशी संबंध आला तोपर्यंत कांहीं सहपाठी मित्र होते.पण पदवीपरीक्षा होईपर्यंत अनेक नवनवीन मित्र संपर्कात येत होते.सर्वांशीच संबंध सलोख्याचे राहिले.पण, आयुष्यभर टिकणारी घनिष्ठ मैत्री काही मोजक्या मित्रांशीच निर्माण झाली ती केवळ मैत्रीत होणा-या गप्पांमुळेच.मला आठवतोय तो पदवीधर झाल्यानंतरचा सुवर्णकाळ.कदाचित १/२ वर्षानंतरचा काळ असेल पदव्यूत्तर शिक्षण बहिस्थ विद्यार्थी म्हणून सुरू होते.विद्यार्थी परिषदेच्या कामात पूर्णत: सक्रीय होतो.नवनविन कार्यकर्ते परिषदेच्या कामात जोडण्याचा प्रयत्न सुरूच होता.अधूनमधून काॅलेजातही जाणे होत असे.त्यावेळी काॅलेजात अत्यंत उत्साही गृप परिषदेच्या कामात सक्रिय झाला.परिषदेच्या कामासाठी हा संपूर्ण गृप अधिक सक्रिय करायचा असेल तर मैत्री वाढवली पाहिजे म्हणून त्यातील तिघांकडे माझे वरचेवर जाणं होवू लागलं. त्यात विकास हा संघ   कामात असल्याने पूर्वपरिचीत होता पण प्रदीप आणि राजेश,संजय ,शेखरची नव्यानं मैत्री झालेली.ती अधिक घनिष्ठ होत गेली ती आमच्यात होत असलेल्या बहुआयामी गप्पांमुळे.सलग ४/५ वर्ष आम्ही सोबतच असायचो म्हणजे इतके की २४ तासांपैकी २० तास असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.एवढे तास आम्ही गप्पा मारतच असायचो.परिषदेचं काम, कार्यक्रम,योजना , संघटनात्मक बांधणी हे विषय तर होतेच पण अन्य वेळात राजकारण, समाजकारण, साहित्यिक विषय,एखाद्या सिनेमा किंवा नाटकाचे कथानक, वृत्तपत्रातील लेख, अग्रलेख,पुस्तक वाचन, एखाद्या कवितेची चर्चा असे कितीतरी विषय गप्पांमध्ये असायचे.त्यामुळे वेळ कसा निघून जायचा ते समजायचंच नाही.कित्येकदा पूर्ण रात्रसुध्दा सरून जायची.अभ्यास,घरातली कामही एकमेकांच्या सोबतीने व्हायची.जेवण सुध्दा कित्येकदा आमच्यापैकी एखाद्याच्या घरीच उरकायचे.आमच्यापैकी सगळ्यांच्याच घरी तुम्ही एवढ्या काय गप्पा करतात ? हा यक्षप्रश्न कायमच पडलेला असायचा.कुणाच्याही घरी त्यांचे आई-बाबा घरी नसणं ही आमच्यासाठी पर्वणीच असायची मनसोक्तपणे खाणं अन् मनसोक्त गप्पा.त्यानंतर आई किंवा बाबांचा ओरडा पण खावा लागत असे.आमच्यासोबत काही नविन मित्रही कधीतरी असायचे.एकदा एका नवीन मित्राने निरागसपणे असं म्हटलं की 'तुम्ही काय बोलतात ते मला फारसं कळत नाही पण जे काही बोलता ते ऐकायला खूप छान वाटतं'.एकाने हा अग्रलेख पेपरात कुठं असतो? असंही प्रांजळपणे विचारलं.आमच्यापैकी कुणालाही वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत किंवा अगदी परिषदेच्या कार्यक्रमात बोलायचं असेल तर त्याची भाषणापूर्वी व भाषणानंतर विस्तृत चर्चा व्हायची. यामुळे आमचं वक्तृत्व विकसित झालं . एखादा लेख अथवा निबंध लिहीतांना सुध्दा आम्ही सामुहिक चर्चा करत असू. एकदा तर राष्ट्रभाषा सभा पुणेची  पंडित परीक्षा आम्ही सोबत दिली.कामाचा व्याप आणि काॅलेजचा अभ्यास यामुळे दोन दिवसांवर परीक्षा आलेली असूनही असल्यास नव्हता ४ पुस्तकं अभ्यासाला होती.आम्ही प्रत्येकाने एकेक पुस्तक एका दिवसात अभ्यासलं.दुसर् या दिवशी गप्पांचा विषय आपण अभ्यासलेलं पुस्तक विस्तृत सांगणं असाच होता.गप्पांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सर्व पंडित परीक्षा विशेष श्रेणीत पास झालो.तर अशी ही आमची मैत्री आणि आमच्या गप्पा.यामुळे आम्ही समाजजीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात झोकून देवून काम करू शकलो किंबहुना ती क्षेत्र गाजवली.आजही आम्ही आपापल्या परीने सक्रिय आहोतच पण आमची ही मैत्री आजही ताजीतवानी आहे.आम्ही क्वचित कधीतरी भेटलो तरी गप्पांमधला तोच जिव्हाळा आजही तसाच आहे.कदाचित वेळ कमी-जास्त होत असेलही पण त्या गप्पांमधला आनंद काही औरच आहे.असे अनेक मित्रांचे चमू अनेक आहेत अगदी आताच्या पिढीतही ते दिसून येतं.संगीत,नाटक, चित्रपट,कविता, सामाजिक उपक्रम, पुस्तक वाचन, नविन संशोधन, क्रीडा क्षेत्र, परराष्ट्रीय धोरण,,युध्दस्य वार्ता असे शेकडो विषय गप्पांचे राहिले तर नकारात्मक विचार आपल्यापासून शेकडो मैल  दूर राहतात याची अनुभूती आम्ही घेतली आमची पुढची पिढीही ती घेतेय.
' समान शीले व्यसनेषु सख्यम् 'असं एक संस्कृत वचन आहे.आपल्याकडे चुकीच्या अर्थाने ते वापरतात.. पण चांगल्या अर्थाने अशा समान चारित्र्याचे सारख्या आवडीचे चमू एकत्र येणं, त्यांच्यातील मैत्रीभाव वाढण्यासाठी गप्पांचे फड रंगणे हे सशक्त समाजरचनेचे लक्षण आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली पसायदानात " भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे "असं साकडं त्या विश्वात्मक परमेश्वराला घालत असावेत.त्याचा अर्थबोध व्हावा एवढीच अपेक्षा.
            धन्यवाद!!

No comments:

समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री

  समर्थांच्या राजकारणाची त्रिसूत्री पाहिले ते हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || ग्रंथराज दासबोधाचे वाचन करत...